आई-चतुर्थ पुण्यस्मरण

आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन चार वर्षे झाली पण.दिवस कसे भराभर निघून जातात मनाच्या कप्प्यात आठवणींचा दरवळ मागे ठेऊन ते कळतही नाही. पण एकमात्र खरं प्रसंगानुरूप येतच असते ग तुझी आठवण आणि आतातर जास्तच कारण मधला काही काळ मन तयार नव्हतं म्हणा की सुन्न झाले होते म्हणा; पण तू आता आमच्यासोबत नाही हा विचार मनात पण न फिरकू देण्याचे अविवेकी म्हण,नाही तर अजून काही -प्रयत्न अज्ञानपणे आम्ही करून बघितले, समजावत राहिलो मनाला की, तू आहेस कोणाच्या तरी घरी आणि आता काही वेळाने फोन करून सांगशील की, भाऊ आम्ही येतोय तुझ्या घरी, खूप दिवस झाले नातवंडांना भेटून तेव्हा त्यांची- तुमची उभ्या उभ्या भेट घेऊन परत जाऊ;पण कसचं काय? उगीचच आपले मनोविभ्रम,आणि काय? पण आताशा कळलं आणि थोडं थोडं उमगतही चाललं की, जे आपण दूर लोटू इच्छितो तेच अंतिम आणि कदाचित एकमेव शाश्वत सत्य आहे या भूलोकावरचे.पण ते एकदा कळल्यावर आता हेही लक्षात येतेय की आई गमावणे म्हणजे नेमकं काय असतं! हुंदका दाटून येतो मनात पण सांगणार कुणाला? आणि हो,आता जरा मोठं झाल्याचं ओझं नाही;पण जबाबदारी म्हणूया हवं तर असं हळवं होऊन व्यक्त व्हायची मुभा पण संपली ग! कारण मग जे मागे आहेत त्यांना कोण धीर देणार असं वाटत राहतं. असो तुझा आशिर्वाद सदोदित पाठीशी राहू दे, तोच एक आधार आहे येथून पुढच्या वाटचालीत.

Comments

  1. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई -तृतीय पुण्यस्मरण