Posts

Showing posts from March, 2010

अट्टल- किशोर पाठक

परवापरवाची गोष्ट. संक्रांतीला विदांना एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मुंबईत गेलो. फक्त ब्याण्णव वर्षांचे तृप्त विदा. कायम स्वत:त मग्न नजर. तळाचा वेध घेत जाणारी. खास कोकणी तुकतुकीत रंग. वय उतरत गेलेलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर दुधावरच्या घट्ट सायीसारखी घनदाट कांती. पांढरी बंडी, गोल ढोपरावर सरकलेला लेंगा आणि थकलेला धीरगंभीर अनुनासिक स्वर ! पहिला प्रश्न, 'जेवलात?' नंतर पाणी. तब्येतीमुळे कार्यक्रमास येण्यास नम्र नकार. नंतर म्हणाले, 'तीळगूळ घेऊन जा.' संथ चालीत स्वत: चालत विदा आत गेले. तीळगुळाचा लाडू हातावर ठेवला. मी नमस्कार केला. म्हणाले, 'नमस्कार करू नका.' म्हटलं, 'का? असे पाय आता कमी आहेत ज्यांच्यावर डोकं टेकावं.' तसे म्हणाले, 'सांगतो. डोकं टेकावं अशी माणसं तीनच ! एक साने गुरुजी, दुसरे सेनापती बापट, तिसरे बाबा आमटे !' नंतर क्षणभर थांबले आणि म्हणाले, 'बाकीचे आहेत पण नमस्कार केल्यावर हात धुवून घ्यावे लागतात...' हा खास विदांचा स्पर्श, रोखठोक, शब्दांना खरबरीत करणारा, भावनांना कोरडेपणा नाही तर नेमकेपणाने धार देणारा, खमक्या आणि अट्टल

'मरतुकड्या' समाजाची भाषा कशी जगेल?- अनंत सामंत

प्रश्नांची मांडणी आपण नेहमीच चुकीच्या दिशेने करीत असतो. भाषेचे जतन, संवर्धन आपण कसे करणार? भाषा समाजाचे संवर्धन करीत असते. त्यामुळे समाजाचे जतन, संवर्धन झाले की आपोआपच भाषेचेही जतन, संवर्धन होते. भाषेमुळे समाजाची संस्कृती तयार होते. तो समाज प्रगल्भ होतो. भाषेमुळेच त्याला प्रेरणा मिळते. जो समाज आपली भाषा सोडतो तो त्याच्या अस्तित्वालाच मुकतो. आईच्या हातचे जेवण नाकारून, घरचे जेवण सोडून जो केवळ फास्टफूडवरच जगतो त्याच्या अंगावर अनावश्यक सूज वाढते. अकाली मृत्यूलाही त्याला सामोरे जावे लागते. ज्यावर तुमचे भरण-पोषण होते तसेच परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. आईच्या हातच्या जेवणाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही; पण स्वत:च्या जीवनाचे महत्त्व कळणेही गरजेचे आहे. ज्या समाजात आपण राहतो तो समाज टिकवा, त्याचे संवर्धन करा. भाषेचे जतन, संवर्धन करण्याची गरजच राहणार नाही. ते आपोआपच होईल. समाजातील काही घटक, तरुण पिढी काही वेळा समाजापासून वेगळे व्हायला लागतात. असे का व्हावे? - समाजाला अभिमान वाटावा असे काहीतरी त्या समाजात सापडले पाहिजे. तसे काहीच जर सापडले नाही, तसे आदर्श व्यक्तीला समाजातून मिळाले

आपल्या मुलांना मराठी शिकवण्यात लाज कसली?- अरुण ठाकूर

तुम्ही अलीकडच्या काळात कधी पुस्तकाच्या दुकानात गेला होतात? म्हणजे क्रॉसवर्डमध्ये नाही, मराठी पुस्तकांच्या दुकानात? किंवा पुस्तकांच्या जाहिराती पाहिल्या आहेत? त्यात बहुसंख्य मराठी पुस्तके अनुवादित असतात ! सगळ्यात जास्त पुस्तके आहारशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, श्रीमंत कसे व्हावे आणि झटपट इंग्रजी कसे बोलावे या विषयांवर असतात. चांगली मराठी कादंबरी आपण कधी वाचली होती हे तुम्हाला सहजासहजी आठवते का? एकूणच मराठी साहित्य रोडावले आहे, कारण मराठीचा परीघच आक्रसला आहे. आज मराठी ही मोलकरणींशी बोलण्याची भाषा आहे. या मोलकरणींनाही इंग्रजी शिकवले की तिही गरज संपेल आणि खऱ्या अर्थाने आपण जागतिकीकरण साध्य करू असे आपल्याला वाटते. मराठीची ही हीनदीन अवस्था काही अचानक झालेली नाही. मराठीत शिकलेल्या लोकांचा आत्मविश्वास खचला म्हणून मराठीची आज अशी गत झालेली आहे. १९२७ पर्यंत महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणही मराठीत दिले जात होते. आज आपण ज्या हिंदी भाषकांच्या नावाने बोटे मोडतो, त्या हिंदी भाषकांनी आजही संपूर्ण हिंदीत अभियांत्तिकीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केलेली आहे. पण मराठी लोकांना मात्र आपली भाषा ही ज्ञानभाषा हो

।। आहार हेच औषध।। (न्यूट्रास्यूटिकल्स) -डॉ. उल्हास कोल्हटकर

आहारशास्त्र हे एकमेव असे शास्त्र असावे की ज्यात आपणाला सर्व काही कळते अशी आपल्यापैकी बऱ्याच जणांची समजूत असते. दुर्दैवाने परिस्थिती बहुसंख्य वेळा उलटीच असते. आधुनिक तंत्र-विज्ञानामुळे आरोग्य शास्त्राची व आधुनिक वैद्यकाची क्षितिजे विस्तारू लागल्यापासून तर, आहारशास्त्र अधिकाधिक प्रगत व गुंतागुंतीचे होऊ लागले आहे.केवळ पोषणापुरत्याच त्याच्या मर्यादा न राहता, विविध आजारांच्या उपचारांमध्ये व रोगप्रतिबंधनामध्येही ‘आहारा’ची भूमिकाही अधिक ठळक होऊ लागली आहे. जणुकीय पाश्र्वभूमी लाभलेल्या जीनॉमिक्स (GENOMICS) च्या सहाय्याने उपचारांमध्ये अतिविशिष्ट वैयक्तिक आहाराचा (Personalised Food Therapy) उपयोग हे आहारशास्त्राचे एक नवे क्षितीज. या सर्व घडामोडींना, विशेष करून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे विशेषकरून आहाराचा औषध म्हणून उपयोग करण्याच्या शास्त्राचे सन १९८९ मध्येच ‘फाऊंडेशन फॉर इनोव्हेशन इन मेडिसीन’ यू.एस..च्या संस्थापक चेअरमन डॉ. स्टीफन डिफेलिस यांनी छान बारसे केले आहे व ते म्हणजे- न्यूट्रास्यूटिकल्स- न्यूट्रिशन + फार्मास्युटिकल्स- आहार + औषध! तसे पाहिले तर गेल्या काही शतकातील आहारा

शैक्षणिक क्रांतीचा एक नवा धडा

विदेशी विद्यापीठांना भारतात आपली संकुले स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. संसदेच्या चालू अधिवेशनात यासंबंधातल्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर विदेशी विद्यापीठांच्या भारतातील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल. या प्रस्तावाला डावे पक्ष, बहनजी मायवतींचा बहुजन समाज पक्ष, फुटून चिंध्या झालेला मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष व लालूंचा राजद या पक्षांनी विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपने या विधेयकाबाबत अजून आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी या विधेयकाला त्यांचा पाठिंबाच असेल असे सध्या तरी दिसते. त्यामुळे संसदेत हे विधेयक मंजूर होण्यात काही अडचण येईल, असे दिसत नाही. यापूर्वीही कॉँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यु.पी.ए. सरकारने २००७ साली याच आशयाचे विधेयक मंत्रिमंडळात मंजूर केले होते. परंतु त्यावेळी सरकारला टेकू देणाऱ्या डाव्या पक्षांनी या विधेयकाला संसदेचा दरवाजाच दाखविला नाही व अशाप्रकारे या होऊ घातलेल्या शैक्षणिक क्रांतीचा डाव्यांनी गर्भपात केला होता. आता मात्र हे विधेयक मंजूर झाल्यास देशात शैक्षणिक क्रांतीच्या एका नव्या धडय़ाची सुरुवात होईल हे निश्चित.

जगाचे उत्पादन केंद्र भारत

हे खरे आहे की, पुढल्या १० वर्षांत भारत वैश्विक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे. आजवर आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात प्रमुख घटक शेती हाच होता. औद्योगिक उत्पादन दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर होते. आता गेल्या १० वर्षांत प्रथमच औद्योगिक उत्पादनाने राष्ट्रीय उत्पन्नातील आपला वाटा शेतीपेक्षा अधिक ठेवला आहे आणि तो येणाऱ्या काळात अधिक वेगाने वाढणार आहे. भारतातील आर्थिक उदारीकरणानंतर आपले औद्योगिक क्षेत्र वेगाने विस्तारू लागले. औद्योगिक उत्पादनातील प्रमुख सात क्षेत्रांत आपले उद्योग जागतिक क्रमवारीत पहिल्या १२ मध्ये पोचले आहेत. कापड उद्योग तर आजही चौथ्या क्रमांकावर आहे आणि इलेक्ट्रिकल मशिनरी उद्योग पाचवे स्थान पटकावून आहे. मशिनरी, इक्विपमेंटस् आणि मोटारी परदेशातूनच आणायच्या असतात असे आजवर आपण समजत होतो. आता या क्षेत्रातही भारत १२ व्या क्रमांकावर पोचला आहे. १९९९-२००० मध्ये आपण ४.८ दशलक्ष वाहने तयार करीत होतो. ही संख्या आता तिप्पट होऊन १२ दशलक्षांवर पोचली आहे. वाहनांच्या निर्यातीतही भारत आता आशियातील चौथा महत्त्वाचा देश गणला जातो. औद्योगिक उत्पादनाच्या विविध क्षेत्रांत आपले उद्योज

मराठी मनातला गोंधळ

प्रत्येकालाच आपली भाषा प्रिय असते. पण सध्याचं भाषेवरून चाललेलं राजकारण पाहता नेमकं कळत नाही की आपण आपल्या भाषेचा बाळगतो तो अभिमान आहे की दुराभिमान? भाषा ही आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक वगैरे असते, असं म्हणतात. पण संस्कृती ही आपल्या वेगळ्या अस्तित्वाची ओळखच ना? मग या संस्कृतीवर दुसऱ्या संस्कृतीचं आक्रमण, म्हणजे आपल्या अस्तित्वालाच धोका, असं समजलं तर कुठं काय बिघडलं? दुसऱ्या एखाद्या भाषेचं आपल्या भाषेवर आक्रमण होत असेल तर साहजिकच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. आपली अस्मिता जपण्यासाठी धडपड सुरू होते. प्रसंगी त्याचं रूपांतर वादात होतं. यातूनच पुढे युद्ध वगैरे झाल्याची उदाहरणंही आमच्या तरुण पिढीच्या तोंडावर फेकली जातात. पण त्याला आम्ही काय करायचं? पंगा नको, म्हणून अतिक्रमण सहन करायचं? त्यात हल्ली आम्हाला ग्लोबलायझेशनचं एक नवं लेबल चिकटलंय. काय म्हणे तर जागतिकीकरणामुळं जग जवळ आलंय. वर प्रसारमाध्यमांची आणि संवादाची क्रांती झालीय म्हणे. हे असे शब्द वापरणारे पुढे जाऊन असंही सांगतात की सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे सुरू झालीय. सब झूठ! अशी देवाण-घेवाण होत असती तर युद्ध आणि दहशतवाद र

आय जस्ट लव्ह मराठी

दरवर्षी मराठी दिन आला की मराठी दिनाचा टिपिकल प्रोग्रॅम समोर येतो. झाडून सगळ्या न्यूजपेपर्समध्ये कुणा एकाला तरी मराठीचं काय होणार असा गहन प्रश्न पडलेला असतो. ते नाही का मध्ये नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यविषयक पुस्तकाची हवा तयार झाली होती. तेव्हा जो उठेल तो रोज एक नवी तारीख सांगायचा की अमक्या अमक्या तारखेला जगबुडी होणार रे होणार. पण काय झालं ? झाली का जगबुडी? काही नाही. उलट आपण आता तो इश्यूच विसरलो. ह्या सो कॉल्ड मराठी भाषाप्रेमींचंही थोडं अधिक असंच आहे, नाही का? दरवर्षी असंच भाषा मरते मरते म्हणून ओरड होते आणि मग नेहमीप्रमाणे सगळे आरोप येऊन शेकतात ते आजच्या तरुण पिढीवर. आजची तरूण पिढी शुद्ध मराठी बोलतच नाही. त्यांच्या मराठी बोलण्यात मराठीपेक्षा इंग्रजीच जास्त असतं. आजची पिढी नेमकी कोणत्या भाषेत बोलते हेच कळत नाही. सारंच अर्धवट आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून आजची पिढी बोलतेय. याच्या पुढची पिढी तर कदाचित मराठीतून बोलणारच नाही. मग भाषा जिवंत राहील कशी? थोडक्यात आजची पिढी मराठी जिवंत ठेवणार नाही.. येत्या काही वर्षांमध्येच मराठीचा अस्त झालेला असेल असं मराठी साहित्याच्या कानाकोप

मराठी माणूस आणि मराठीचा विकास

रहम रहनुमा मरगठ्ठ अस्सी भागे तुरंतम पीने कू लस्सी - हीबाब अलाहिदा (बादशहा जहांगीर यांचे दरबारी शायर आणि प्रवासी बखरकार) उपरोल्लेखित काव्यपंक्ती फारसी भाषेत आहेत की हिंदवी भाषेत आहेत, यावर इतिहासकारांमध्ये तेराव्या शतकापासून वाद पेटला असल्याने आणि अद्याप तो विझला नसल्याने आम्ही त्यात पडू इच्छित नाही. हीबाब अलाहिदा यांचे नाव कोणाला ठाऊक नाही? इतिहासाचे अभ्यासक आणि विद्यार्थी तसेच शालेय शिक्षक आदी जमातीत हे नाव खूपच परिचयाचे आहे. अर्थात ज्यांस हे नाव ओळखीचे वाटत नसेल, त्यांनी उभ्या आयुष्यात इतिहासाचे म्हणून एकही पुस्तक वाचलेले नाही, असे आम्ही म्हणू! शिवछत्रपतींचे जानेमाने इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांस कुणीतरी कधीतरी अलाहिदा साहेबांसंबंधी छेडले असता त्यांनी पृच्छकाकडे सपशेल दुर्लक्ष करून कुण्या ऐऱ्यागैऱ्यास तेथल्या तेथे मुजरा घातला. वर उल्लेखिलेला पृच्छक म्हणजे अस्मादिक होत. इतिहासाचे पुस्तक सोडा, इतिहास म्हणून आपली बुके खपविणारे वपुश्रीमान बाबासाहेब तथा ब. मो. पुरंदरे यांच्याही दृष्टोत्पत्तीस जनाब हीबाब अलाहिदा यांचे नाव आजवेरी पडो नये, यापरता दैवदुर्विलास तो कोणता? हीबाब अलाहिद

OCR तंत्राच्या प्रतीक्षेत मराठी

ओसीआर अर्थात ‘ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्नीशन’ हे संगणकीय तंत्रज्ञान. भाषेतले अक्षर डोळ्याला दिसणे (वा भासणे) याच्याशी Optical Character हे दोन शब्द थेट संबंधित आहेत. त्याच्या पुढे ‘रेकग्नीशन’ हा शब्द आहे. अक्षर डोळ्याला भासणं आणि त्याचे रेकग्नीशन म्हणजे ओळखणं हे सारं इथे संगणकीय तंत्राच्या संदर्भात आलं आहे. आजकाल स्कॅनर्स घरोघर येऊ लागलेत. स्कॅनरमध्ये पुस्तकाचे एखादे पान घातले की स्कॅनरचे डोळे ते पान पाहतात व त्याची प्रतिमा आपल्या संगणकाच्या पडद्यावर आणून ठेवतात. एक प्रकारे स्कॅनर त्या पुस्तकाच्या पानाचे छायाचित्रच घेत असतो. हे छायाचित्र घेताना त्या पुस्तकाच्या पानावरील मजकूर कोणत्या भाषेत आहे याच्याशी स्कॅनरला देणे-घेणे नसते. स्कॅनरच्या दृष्टीने मजकूर किंवा त्यातले प्रत्येक अक्षर हा चित्राचा एक भाग असतो. स्कॅनरने पुस्तकाच्या पानाची व त्यावरच्या मजकुराची जी प्रतिमा घेतली की त्यातला एखादा शब्द वेगळा काढण्याची वा बदलण्याची सोय नसते. कारण सारा मजकूर मिळून एक संपूर्ण चित्र आपल्या स्क्रीनवर आलेले असते. ओसीआर तंत्रज्ञानाची एन्ट्री या टप्प्यावर होते. स्कॅन केलेल्या पानावर केवळ चित्र म्हणून दिसणा

नवी बहुभाषिक तंत्रविद्या मराठीला लाभदायक

आजही आपल्या भाषेचा विचार संगणकाशी जोडून जेव्हा होतो तेव्हा तो प्रामुख्याने मुद्रणकेंद्री असतो. टंकलेखनयंत्राचा पर्याय म्हणूनच आपण संगणकाकडे पाहतो. भाषा आणि संगणक यांच्या संबंधाचा विचार खरं तर याहून अधिक खोलात जाऊन करायला हवा. माहिती-तंत्रज्ञान हा आजच्या काळातला कळीचा शब्द आहे. ही ज्ञानशाखा माहिती नोंदवण्याचे, ती नेटकेपणाने मांडण्याचे, हवी ती माहिती सहज हुडकण्याचे, माहितीची देवाणघेवाण सुकर करण्याचे नवे नवे मार्ग चोखाळते आहे. मानवी समूहात या माहितीच्या देवाणघेवाणीचं महत्त्वाचं माध्यम भाषा हेच आहे. त्यामुळेच मानवी भाषेतील माहितीवर संगणकाच्या साहाय्याने विविध प्रक्रिया कशा करता येतील याचा अभ्यास करणारी भाषासंस्करण ही ज्ञानशाखा निर्माण झाली. मानवी भाषा वापरणाऱ्या संवादकुशल संगणकप्रणाल्या कशा रचता येतील यावर या शाखेत संशोधन होत असतं. भाषेचं उच्चारित रूप आणि लिखित रूप या दोहोंचाही सखोल अभ्यास संगणकप्रक्रियेच्या दृष्टीने होत असतो. जगातील विविध भाषांसाठी विविध संगणकीय साधनं मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मराठी भाषेसाठी आपल्या समाजात यापैकी काय काय चाललं आहे याचा शोध घेऊ गेलो तर निराशाच

दुटप्पीपणामुळे मराठीची पिछेहाट

गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिक आहे असं म्हणता येईल असं कोणतंही वर्तन इथल्या राज्यकर्त्यांकडून घडलेलं नाही. याचं कारण- राज्यकर्त्यांमध्ये मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी, यासाठी कोणती धोरणं अंमलात आणावीत याबाबतच्या दृष्टीकोनाचा असलेला अभाव होय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्यांच्याकडे समाजाचं वैचारिक सांस्कृतिक नेतृत्व होतं त्या लेखक, कलावंत, पत्रकार या वर्गाने मराठीबद्दल बोलण्यात दाखवलेली आस्था प्रत्यक्ष जीवनात मात्र दाखवली नाही. त्यामुळे एकूण समाजातच एक प्रकारचा दुभंगलेपणा आला. मराठीबद्दल जाहिरपणे कळकळ व्यक्त करायची आणि प्रत्यक्ष जीवनात मात्र मराठीला प्रतिकूल ठरतील अशा भूमिका घ्यायच्या, या प्रकारच्या दुटप्पीपणामुळे मराठीची सर्व क्षेत्रातली पिछेहाट हा राज्याचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास आहे. नीट पावलं उचलली नाहीत, तर पुढच्या २५ वर्षांत यापेक्षाही वाईट स्थिती असणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर मराठी शाळांच्या दुरवस्थेचं देता येईल. मराठी शाळांचं खच्चीकरण आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं वाढतं लोण ही गोष्ट आता खेडय़ापाडय़ांत पोहोचली आहे. आणखी २५