सुंदर तेचि वेचावे..

घरांसमोर नित्यनियमांनं घातली जाणारी सडा-सारवणं, त्यावरील रांगोळ्या, प्रसंगानं बांधली जाणारी दरवाजांवरील तोरणं, घरांसमोरील तुळशीवृंदावनं, गुढीपाडवा-होळी-रंगपंचमी-गणेशोत्सव-दीपावलीसारखे सणप्रसंग यांमधून महाराष्ट्राच्या दृश्यसंस्कृतीचं सुखद दर्शन घडत असतं. मान्य, की मराठी दृश्यसंस्कृतीच्या या साऱ्या खुणा आज केवळ रिवाजापुरत्या शिल्लक आहेत. काही तर भ्रष्ट बनल्या आहेत! पण कधी काळी याच खुणांमधून आम्ही आमच्या सौंदर्य-आराधनावादी जीवनशैलीबाबतचा पुकारा करत असू. खरं ना?
या विशिष्ट पुकाऱ्यामागचा सांस्कृतिक इतिहास आजवर कुणी लिहिलाय व कधी लिहिलाय, ते ठाऊक नाही! पण या पुकाऱ्याचा मथितार्थ विसरताना आम्ही कधी काळी अजंठा-वेरूळ निर्माण करणारं निर्मितीक्षम जीवन जगत होतो, हेही विसरून गेलो. आम्ही विसरलो, की ‘सुंदर तेचि वेचावे, सुंदर करोनी मांडावे, इतरांसाठी!’ हे आमचं अत्यंत साधं असं निर्मितीक्षम तत्त्वज्ञान होतं. आम्ही विसरलो, की कुठलीही गोष्ट सुंदर करून ‘इतरां’साठी मांडताना आमच्या औचित्य आणि सौंदर्यविषयक जाणिवा एकत्र येत होत्या.. आपल्या हातांना सुंदर काही घडवण्याची प्रेरणा देत होत्या.. गती देत होत्या! या औचित्य आणि सौंदर्याच्या मिलाफालाच ‘लालित्य’ म्हणतात, असं विख्यात नृत्यपंडिता रोहिणी भाटे यांनी सांगितल्याचं निश्चितपणे स्मरतं.
तेव्हा अजंठा येथील गुंफाचित्रं काय किंवा वेरूळमधील शिल्प-स्थापत्य काय, निसंशयपणे ती महाराष्ट्र-भारतात अस्तित्वात असलेल्या ‘लालित्यपूर्ण व्यापक उद्यमशीलतेच्या मार्गा’ची साक्षीदार होती. जेव्हा कुंभारपुत्र शालिवाहनानं या मार्गावरचं ‘सुंदर तेचि वेचावे, सुंदर करोनी मांडावे, इतरांसाठी!’ हे साधं तत्त्वज्ञान मातीमोल जीवन जगणाऱ्या आपल्या दरिद्री समाजबांधवांसमोर उलगडलं; तेव्हा त्यांना निर्मितीक्षम बनून दारिद्रय़ हटवण्याचा मार्ग सापडला. या दारिद्रय़निर्मूलन मार्गावरचा विजय लोकांनी गुढय़ा उभ्या करून साजरा केला. हा विजय देशवासीयांच्या दृश्यजाणिवा समृद्ध बनल्याने लाभलेला विजय होता.
पुढे गुढय़ा उभारण्याचा नियम आम्ही प्रतिवर्षी पाळत राहिलो. पण कसं काय कोण जाणे, ‘लालित्यपूर्ण व्यापक उद्यमशीलतेच्या मार्गावरची मराठी-भारतीय घोडदौड’ थांबली. या ‘घोडदौडी’ला पूरक ठरणारी सडा-सारवणं आणि रांगोळ्यांची मराठी दृश्यसंस्कृती केवळ रिवाज बनली. महाराष्ट्र-भारतात आमच्या दृश्यजाणिवा समृद्ध करणारं वैचारिक अभिसरण थांबल्यामुळेच आमच्यात सांस्कृतिक- सार्वजनिक- सामाजिक- राजकीय- राष्ट्रीय बोथटपणा येत गेला. या प्रत्येक स्तरावर आमची सकारात्मक संवेदनशीलता जागवणारी सौंदर्यदृष्टी हरवत गेली.. तसं आमचं अध्यात्म टिकून राहिलं, पण महाराष्ट्र-भारताचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी हवा होता आमच्या सकारात्मक संवेदनशीलतेनं घडवून आणलेला व्यापक सौंदर्यदृष्टी आणि अध्यात्माचा मिलाफ.. हवा होता ऐहिक-आध्यात्मिकाच्या द्वैतातील ऐक्य साधणारा, ‘व्यापक उद्यमशीलतेच्या मार्गावरील कसोटय़ा उत्तीर्ण करण्याचा विचार पसरवणारा’ इतिहास!
पुढे ‘संसार करावा नेटका’ असं म्हणत ‘हा’ इतिहास सांगणारे ‘समर्थ’ आमच्यात होऊन गेले. ‘हा’ इतिहास प्रत्यक्षात उतरवणारे ‘महाराज’ आम्हाला छत्रपती म्हणून लाभले, पण महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्याचा’ खरा ‘सुसंस्कृत व राष्ट्रकारक इतिहास’ सांगणारे इतिहासकार आम्हाला लाभले नाहीत. ‘हिंदवी स्वराज्याचा कवडसा’ पसरला नाही.. विस्तारला नाही. मराठी अस्मितेला खरं नख लागलं, ते इथं!
केवळ यामुळे महाराष्ट्र-भारतात नोंद झाली ती साडेआठशे वर्षांच्या पारतंत्र्याची.. ‘सांस्कृतिक, वैचारिक ऱ्हास-दास्या’ची! या विशिष्ट ‘दास्या’च्या अंमलात मराठी-भारतीयांनी सर जमशेटजी जीजीभाईंनी १८५३ साली केलेल्या एका अतीव महत्त्वाच्या विधानाचा ‘कोळसा’ करणारा इतिहास मात्र रचला. हा इतिहास आजही आम्हाला छळतो आहे..
सर जमशेटजींचं विधान असं होतं : ‘उत्तम प्रशिक्षणाची जर सोय झाली, तर भारतीय लोक थोर दर्जाचे चित्र-शिल्पकार आणि कारागीर तर बनतीलच, पण या दृश्यकलांच्या प्रशिक्षणातून तयार होणारा  ‘(लालित्यपूर्ण) व्यापक उद्यमशीलतेचा मार्ग’ भारतासाठी अति महत्त्वाचा ठरेल! या मार्गावरच्या ‘कसोटय़ा’ भारतीयांना जर समजल्या, त्या उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक ते वैचारिक अभिसरण भारतात पुरेशा प्रमाणात घडलं, तर भारत ‘पुन्हा एकदा’ प्रगत उत्पादक देशांच्या यादीत सर्वोच्च स्थानी चमकेल!’या विधानात सर जमशेटजींना असं सुचवायचं होतं, की प्रगत उत्पादक देश बनण्यासाठी देशातील सर्वसामान्य माणसापाशीही आराखडय़ानुसार, नियोजनानुसार, विशिष्ट क्रमाने आणि शास्त्रशुद्ध रीतीने काम करण्याची ‘पद्धत’ असावी लागते. सर जमशेटजींच्या अनुभवानुसार या पद्धतीची प्रेरणा दृश्यकला आणि कारागिरीच्या प्रशिक्षणातूनच लाभत असते. सर जमशेटजींना असंही सुचवायचं होतं, की ही ‘पद्धत’ भारतातल्यासारख्या समाजात रुजवण्याची नितांत गरज होती (आजही आहे). विचारवंतांनीही सौंदर्य आराधना महत्त्वाची मानणारी दृश्यसंस्कृती समाजाला सातत्याने समजावून सांगावी आणि कलावंतांनी तर जाणीवपूर्वक सौंदर्यभक्ती मार्गी लावणारी निर्मिती करत राहावं. थोडक्यात, ‘प्रत्येक क्षेत्रात सौंदर्यपूर्ण पर्यावरणप्रेमी नवनिर्मितीचा ध्यास धरा, अराजक- गोंधळ- अस्वच्छतेला मूठमाती द्या’ हा प्रगत उत्पादक देशाप्रती नेणारा मार्ग होता.
या विधानासोबतच तत्कालीन ब्रिटिश सरकारला सर जमशेटजींनी रु. एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यानुसार १८५७ साली मुंबईत ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री’ची स्थापना झाली. १८५९ साली सर जमशेटजींचं निधन झालं. १८६० नंतर ब्रिटिश सरकारनं आर्ट स्कूलच्या नावातील ‘इंडस्ट्री’ हा शब्द धूर्तपणे हटवला. तत्पूर्वीच्या ‘सांस्कृतिक- वैचारिक ऱ्हासा’त अडकलेल्या मराठी- भारतीय सुशिक्षितांना महाराष्ट्र- भारताच्या भवितव्यात ब्रिटिशांनी मारलेली ही ‘पाचर’ नंतर कधीही दिसली नाही. बोचलीही नाही!
१८६० ते १९६० या शंभर वर्षांत मराठी- भारतीय दृश्य कलावंतांनी जो सांस्कृतिक- सार्वजनिक- सामाजिक- राजकीय आणि राष्ट्रीय सौंदर्यदृष्टीरहित इतिहास रचला, तो  नि:संशय त्यांच्यावर स्वार झालेल्या सांस्कृतिक- वैचारिक ऱ्हासाचा इतिहास ठरला आहे, किंबहुना तो इतिहास मराठी- भारतीयांना ‘व्यापक बोथटपणात’ अडकवून गेला आहे. आणि अर्थातच, या बोथटपणात ‘प्रगत उत्पादक भारत’ ही दृश्यकला- सौंदर्यसापेक्ष संकल्पना असल्याचं आज कुणाला मान्य होत नाही. उलट, फक्त आकडेवारीत सिद्ध होणाऱ्या महासत्तेच्या अमूर्त छबीत सारेच जणू रमून जातात. गोरगरिबांना वगळतात. एक ‘सांस्कृतिक अर्धवटपणा’ मराठी अभिजनांच्या- बहुजनांच्या माथी कायम बनतो. ८३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समोर येऊन ठेपलं असतानाही मराठी सारस्वतांना सव्वाशे वर्षांपूर्वीचं ऑस्कर वाइल्ड या ब्रिटिश साहित्यिकाचं ‘दृश्यकला- सौंदर्यसापेक्ष प्रगत उत्पादक राष्ट्रचिंतन’ ज्ञात नसल्यासारखी परिस्थिती मात्र दिसत आहे.
‘देशवासीयांची आयुष्य जुगार ठरण्यापासून वाचवण्याची ताकद फक्त सौंदर्य आराधनावादी दृश्य कलांत असते’-ऑस्कर वाइल्डनं १८८३ साली अमेरिकेत सांगितलं होतं. ‘जिथं सौंदर्य आराधनावादी बीजसंस्कृती लोप पावते, तिथं विद्वेशभावना राष्ट्रीय पातळीवर पोहोचते!’
अशी विधानं समोर नसल्यामुळेच भारताला तुकडा स्वातंत्र्य पदरात घ्यावं लागलं. ‘दृश्यकला- सौंदर्यसापेक्ष प्रगत उत्पादक राष्ट्र’ बनण्याचं उद्दिष्ट नजरेसमोर नसल्यामुळेच भारत-पाकिस्तानातील ‘प्राथमिकता’ नकारात्मक राहिल्या. परिणाम? दोन्ही देशांतील वितुष्ट कायम राहिलं. द्विभाजन- त्रिभाजनाचा दुर्दैवी इतिहास रक्तरंजित होत राहिला! या इतिहासात मराठी- भारतीय दृश्यकला क्षेत्राचेही द्विभाजन- त्रिभाजन होत गेलं. पारंपरिक कला, परंपराद्रोही आधुनिक कला, उपयोजित कला असा वर्गकलह सुरू झाला. तो दुरुस्त होण्याऐवजी, उद्योगविश्व, क्रिकेट आणि बॉलिवूडचं नवंच त्रराशिक चंगळवाद आणि परिणामी, नक्षलवाद वाढवत प्रसार माध्यमाद्वारे महाराष्ट्र- भारतावर आज हावी झालं आहे.
सर जमशेटजी जीजीभाईंचं ऋण मानणाऱ्या दृश्यकलावंतांनी जर कुरतडलेल्या रेषांचे धनी असलेल्या ‘रेषा-लेखकां’ना दूर ठेवत एकत्र येण्याचं तारतम्य बाळगलं, तरच जागतिकीकरणाच्या नव्या युगातही खऱ्या अर्थानं पुरोगामी ठरण्याचं भाग्य महाराष्ट्र- भारताच्या ललाटी लिहिलं जाईल. अन्यथा नाही!

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण