‘‘ये दिल मांगे मोअर’’-शहीद कॅप्टन विक्रम बात्रा : लेखक ब्रिगेडियर - हेमंत महाजन

शहीद कॅप्टन विक्रम बात्रा.. कारगिल युद्धाचा अभिमानास्पद चेहरा.. त्याच्या कर्तृत्वाच्या कथा आजही सांगितल्या जातात. त्याच्या आई-वडलांच्या डोळ्यातले अश्रू कधीच पुसले जाणार नाहीत. त्याच्या प्रेयसीनेही त्याच्या आठवणींच्या बळावर जगण्याचा निर्णय घेतलाय. त्याचे नातेवाईक, लष्कर त्याला कधीच विसरणार नाहीत. मात्र त्याही पलीकडे सामान्यांच्या मनातही त्याचं एक अढळ स्थान निर्माण झालंय.
 लेफ्टनंट विक्रम बात्राला काहीही करून ते मिशन यशस्वीरीत्या पूर्ण करायचेच होते. जम्मू-काश्मीरमध्ये १७ हजार फुटांवर ५१४० शिखरावर पाकिस्तानी घुसखोरांनी कब्जा केला होता. हिमाचलच्या लेफ्टनंट विक्रम बात्रा आणि कॅप्टन संजीव जामवाल या दोन्ही सुपुत्रांना हे शिखर १९ जूनच्या रात्री काबीज करण्याचे आदेश देण्यात आले होते. दिवसा ही कामगिरी पार पाडणं कठीण होतं. लेफ्टनंट विक्रम बात्रावर ही कामगिरी सोपवल्यानंतर युद्धभूमीवरच त्याला कॅप्टन अशी पदोन्नती देण्यात आली. कॅप्टन विक्रम बात्राने शिखर ५१४०वर मागच्या बाजूने चढाई करून ते ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तोलोलिंग पर्वतरांगांमध्ये शिखर ५१४० सर्वाधिक उंचीवरचं शिखर आहे. द्रासमधलं हे शिखर सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. जर या शिखरावर आपण पुन्हा कब्जा केला असता तर त्या भागातून पाकिस्तानी घुसखोरांची हकालपट्टी सहज शक्य होती. त्यामुळे पुढच्या विजयाचा मार्गही सुकर झाला असता. त्यामुळे कॅप्टन विक्रमला या शिखरावर पुन्हा तिरंगा फडकवायचाच होता..
किर्र्र काळोख होता.. हवेतला गारठाही खूप वाढला होता. त्यांनी हळूहळू रांगत जाऊन आपल्या चढाईला सुरुवात केली. आपला एकही सैनिक शत्रूच्या गोळीला बळी पडू नये असा निर्धार करूनच कॅप्टन विक्रमने चढाईला सुरुवात केली. तो
जम्मू-काश्मीरमधल्या सोपोरेमध्ये असताना त्याच्या एका सैनिकाचा त्याच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला होता. ‘‘दीदी, ती गोळी माझ्यासाठी होती. माझ्या सैनिकाचा त्यामुळे मृत्यू झाला’’, त्याने त्याच्या बहिणीला सांगितलं होतं. त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई आता सुरू होती. त्याला आपला एकही माणूस गमवायचा नव्हता. त्यासाठी त्याची धडपड सुरू होती. तरीही हा २४ वर्षांचा कॅप्टन डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीचं घोषवाक्य, देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण नेहमीच सर्वात प्रथम येतं हे वाक्य स्वत:ला कायम बजावत होता. आणि हा निर्धार यशस्वी झाला नसता तरच नवल.. कॅप्टन विक्रम आणि त्याच्या सैनिकांनी मोठा विजय मिळवला. १३ जे अ‍ॅण्ड के रायफल्सने शत्रूला नेस्तनाबूत केलं आणि विक्रमने उत्साहाने म्हटलं, ‘‘ये दिल मांगे मोअर’’.. या विजयानंतर पेप्सीची ही तत्कालीन कॅचलाइन कारगिल युद्धाची कॅचलाइन झाली. विक्रम बात्राने देशाच्या इतिहासातलं सर्वात कठीण युद्धभूमीवरजिंकलेलं हे युद्ध होतं.. या शिखरावर ताबा मिळवल्यानंतर त्याने घरी फोन केला होता. ‘‘डॅडी, आय हॅव कॅप्चर्ड..’’ त्याने त्याच्या वडलांना, जी. एल. बात्रांना, एवढंच सांगितलं. त्याच्या या शब्दांचा नेमका अर्थ न कळल्याने त्याचे वडील गोंधळून गेले होते. त्यातच सॅटेलाइट फोनवरून बोलत असल्याने त्याचा आवाज कापत होता. त्यांना वाटलं विक्रमला शत्रूने ताब्यात घेतलं की काय.. पण मग त्याला फोन कसा करता आला. त्यांना काहीच समजेना.. मग अधिक स्पष्ट करून सांग असं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्याने मी शत्रूच्या ताब्यातलं पोस्ट परत मिळवल्याची बातमी दिली. त्याच्या वडलांसाठीही हा क्षण मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा होता. त्यांनी ठेवलेलं त्याचं विक्रम हे नाव सार्थ झाल्यासारखं त्यांना वाटलं..
देशभरातून विक्रमवर कौतुकाचा वर्षांव होत होता. शिखर काबीज केल्यानंतर कॅप्टन विक्रम बात्रा आणि त्याच्या सैनिकांचे पाकिस्तानी बंदुका हातात घेतलेले फोटो देशभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये झळकले होते. त्याला कारगिलचा सिंह अशा नावाने लोक ओळखायला लागले. त्याचं गुप्त नाव होतं शेर शाह. शिखर ५१४०च्या विजयानंतर टायगर हिल जिंकणं फारच सोपं झालं. या विजयानंतर भारताचा कारगिल विजयही निश्चित झाला.. कॅप्टन विक्रमने मिळवलेल्या पहिल्या विजयानंतर नऊ दिवसांनी त्याला बेस कॅम्पवर बोलावण्यात आलं. त्याच्याकडे पुन्हा एक कठीण कामगिरी सोपवण्यात आली होती. ही कामगिरी सोपवल्यानंतर त्याने पुन्हा घरी फोन केलाच नाही. त्याच्या आई-बाबांनी केवळ त्याची झलक टीव्हीवर पाहिली.
तो कारगिलसाठी रवाना होत असल्याची बातमी त्याच्या आईला जेव्हा पहिल्यांदा कळली तेव्हा तिला नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. त्यावेळी लष्करात दाखल होऊन त्याला फक्त १८ महिने झाले होते. जर तो.. त्याच्या आईने मनात आलेले सगळे विचार दूर झटकून टाकले. जर सगळ्याच आया आपल्या मुलाने लष्करात जाऊ नये असा विचार करायला लागल्या तर काय होईल.. देशाचं रक्षण कोण करेल? रोज टीव्हीवर विक्रमला पाहताना त्याच्या आईला हे सारं आठवायचं. पण त्या दिवशी विक्रमला टीव्हीवर पाहताना त्याच्या वडलांना काहीतरी वेगळं वाटलं.. तो म्हणाला की, ‘‘जे सैनिक युद्धामध्ये मारले जातात त्यांच्या कुटुंबीयांकडे शासनाने आणि समाजाने योग्य लक्ष दिलं पाहिजे..’’ त्याचं हे वाक्य ऐकून त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे याची कल्पना त्याच्या वडलांना आली. त्या वेळी त्याच्या वडलांचा बांध फुटला.. विक्रमच्या आईने त्यांच्या रडण्याचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण ते तिला काहीच सांगू शकले नाहीत.. १९९९ साली होळीच्या सुमारास तो घरी गेला होता. त्या वेळी युद्धाला तोंड फुटलं होतं त्यामुळे त्याला कधीही युद्धभूमीवर जावं लागलं असतं. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर ही काळजी दिसून यायची. तेव्हा विक्रमने त्याच्या आई-वडलांना सांगितलं होतं की, ‘‘मी एकतर भारताचा तिरंगा उंचावून परत येईल किंवा त्याच्यामध्ये माझं शरीर गुंडाळलेलं असेल..’’ त्याच्या वडलांना हे सारं पुन्हा आठवत होतं.
विक्रम बात्राचं देशभरात कौतुक सुरू होतं आणि अवघ्या पंधरा दिवसांमध्ये तो शहीद झाल्याची बातमी आली. ८ जुलै रोजी शिखर ४८७५ काबीज करताना त्याचा वीरमृत्यू ओढवला. या कामगिरीवर जाताना तो आजारी होता पण तरीही त्याने माघार न घेण्याचा निर्णय घेतला. १६ हजार फुटांवर शत्रूने आपलं बस्तान बसवलं होतं. या शिखरावर जाणं खूप अवघड होतं. ८० अंशांचा सरळसोट कडा त्यांच्यासमोर होता. त्यातच दाट धुक्यामुळे त्यांना समोरचं दिसणंही कठीण झालं होतं. शत्रूला कॅप्टन विक्रम बात्राच्या येण्याची चाहूल लागली. त्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. कॅप्टन विक्रम आणि त्याचा एक तरुण अधिकारी अनुज नय्यर यांनी शत्रूने केलेल्या प्रतिहल्ल्याला समर्थपणे तोंड दिलं. त्यांनी शत्रूला बंकर्समधून हाकलवून लावलं. एका स्फोटामध्ये विक्रमच्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा पाय जायबंदी झाला तेव्हा कॅप्टन विक्रमने बंकरबाहेर धाव घेतली. त्याच्या सुभेदारने त्याला बंकरबाहेर न जाण्याची विनंती केली पण त्या वेळी आपल्या सैनिकांच्या रक्षणांची जबाबदारी आपल्यावर असते याची जाणीव असलेल्या विक्रमने सुभेदारला सांगितलं की तुझी मुलं-बाळं घरी आहेत. तू जाऊ नकोस. कॅप्टन विक्रम बंकरबाहेर गेला आणि एक गोळी त्याच्या छातीत घुसली. सकाळपर्यंत भारताने या शिखरावर विजय मिळवला मात्र कॅप्टन विक्रम बात्रा मात्र या सगळ्यांच्याच आयुष्यातून कायमचा हरवला..
विक्रमच्या घरच्यांना त्याच्या मृत्यूची बातमी त्याच दिवशी मिळाली. दुपारच्या वेळी कॅप्टन विक्रमच्या घरी दोन अधिकारी गेले होते. मात्र त्या वेळी घरी कोणीच नव्हतं. त्याची आई घरी परत आली तेव्हा त्यांना या अधिकाऱ्यांच्या आगमनाची बातमी मिळाली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. त्यांनी विक्रमच्या वडलांना फोन केला. ते घरी आले. दारात उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी थोडा वेळ थांबायला सांगितलं. त्यांनी पूजाघरामध्ये जाऊन देवासमोर प्रार्थना केली पण त्यांच्या या प्रार्थनेचा काहीच उपयोग नव्हता.. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, ‘बात्रासाहेब, विक्रम बात्रा जिवंत नाही..’
दुसऱ्या दिवशी कॅप्टन विक्रम बात्राचा मृतदेह त्याच्या गावी आणला गेला. लष्करी इतमामामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कॅप्टन विक्रम बात्राने अनन्यसाधारण असं कर्तृत्व दाखवलं होतं. त्याच्या या शौर्याबद्दल त्याचा परमवीरचक्र या सर्वोच्च सन्मानाने गौरव करण्यात आला. त्याचा या कामगिरीतला साथीदार अनुज नय्यर हासुद्धा बंकरवर ताबा मिळवताना शहीद झाला. त्याचा महावीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.
‘‘विक्रमने तीन शिखरं जिंकली.. त्याने वादळी कामगिरी केली आणि आता तो आपल्यातून तसाच वादळासारखा निघून गेला आहे..’’ त्याच्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या वेळी थांबतच नव्हते. कॅप्टन विक्रम यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक त्याच्या घरी गेले होते. ‘‘हा मुलगा जगला असता तर पंधरा वर्षांनी नक्कीच याने लष्करप्रमुखपद मिळवलं असतं..’’ लष्करप्रमुखांच्या या उद्गारांनी कॅप्टन विक्रम याचं कर्तृत्व अधिक झळाळून उठलं.
कॅप्टन विक्रमवर त्याचा जुळा भाऊ विशालचं नितांत प्रेम होतं. विक्रम लष्करात असण्याचा त्याला अभिमान होता. विशाल बात्रा जेव्हा स्कॉटलंडमध्ये गेले होते तेव्हा त्यांचं आडनाव ऐकून एकाने त्यांना विचारलंही की तुम्हाला विक्रम बात्रा माहीत आहेत का.. खरं कर्तृत्व हे असं कायमच आठवणीत राहतं. कॅप्टन विक्रमचं एका मुलीवर प्रेम होतं. तो कारगिलहून परत आला की तिच्याशी लग्नही करणार होता. मात्र तिचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं. त्याच्या मृत्यूनंतर तिने कधीच लग्न न करण्याची शपथ घेतली. ती आजही विक्रमच्या आठवणींच्या आधारावर जगतेय..
विक्रमचे आई-वडील सध्या एकटेच राहताहेत. विक्रमला आवडलं असतं अशा घरामध्ये विक्रमच्या मृत्यूनंतर राहायला गेले. या घरावर विक्रमच्या नावाची पाटीही आहे. ते ज्या घरात राहतात त्या घराच्या गल्लीच्या तोंडाशी एक पाटी आहे. ही पाटी त्याच्या घराची दिशा दाखवते.. विक्रमचे वडील राष्ट्रपतींकडून परमवीरचक्र स्वीकारतानाचा फोटो त्या भिंतीवर अभिमानाने लावण्यात आला आहे. विक्रमच्या जवळचे, त्याच्या गावातले लोक त्याच्या आठवणी या ना त्या रूपात जपताहेत. पण देशही त्याला कधीच विसरणार नाही..
(ref:http://www.lokprabha.com/20100205/abhi.htm)

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण