अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना...

हल्ली ऋतुचक्र पार आकलनापलीकडे गेलेय अगदी व्हाट्स-अपवर अलीकडेच फिरत असलेल्या एका विनोदाप्रमाणे पावसाळा हिवाळा आणि  उन्हाळा, या तीन मुख्य ऋतूंपेक्षा आता हिवसाळा, पावन्हाळा आणि ऊन्हसाळा हेच मुख्य ऋतू म्हणावे असेच काहीसे झाले की काय याची भीतीदायक शंका वाटत राहावी अशी परिस्थिती झालीय. मागच्या काही वर्षात येत असलेल्या अवकाळी पाऊस,गारपीट या नैसर्गिक आपत्ती जणू काही आता नियमितपणे किंवा कायम स्वरूपी येत आहेत की  काय ? हा एक मोठा प्रश्न आज भारत खंडच नाही तर समस्त जगासमोर उभा ठाकला आहे. आत्ता जो प्रश्नच नीट कळला नाही त्याचे उत्तर तरी काय आणि कसे देणार ??  साधारणत: एक वर्षापूर्वी "साप्ताहिक सकाळ" मध्ये किरणकुमार जोहरे यांचा  "अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना..." शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता (तो खालीलप्रमाणे) जो आजही अगदी तंतोतंत लागू पडावा हा दुर्दैवी योगायोग आणि आपण आणि आपले सरकार निगरगट्टपणे अगदी काही झालेच नाही या अविर्भावात; वर्तमानपत्राच्या मागच्या पानावरून पुढे जावे इतक्या सहजतेने मागच्या वर्षातून या वर्षात अगदी तसेच पुढे जात आहोत ही (निष्क्रिय) खंत!
________________________________________________________________________

अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना...
किरणकुमार जोहरे
Saturday, April 26, 2014 AT 12:00 AM (IST)
  
 महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी गारपिटीमुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान सोसावे लागले. त्यातून सावरतो न सावरतो, तोच पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीचा राज्याला तडाखा बसला. याआधीही महाराष्ट्रात गारपीट झाली होती. रत्नागिरीजवळ लांजे तालुक्‍यात 3 ऑक्‍टोबर 2010 मध्ये 50 किलोपेक्षा अधिक वजनाची महाकाय गार पडली. 18 एप्रिल 2011 रोजी कोल्हापूर येथे 25 किलोपेक्षा अधिक वजनाच्या तीन गारा पडल्या होत्या. जानेवारी 2013 मध्ये गारांनी आंध्र प्रदेशात शंभर किलोमीटर परिसरातील सात गावे तासाभरात उद्‌ध्वस्त करून टाकली. आता 2014 मध्ये अमेरिकेतील "पोलर वर्टेक्‍स', "ग्लोबल कुलिंग', तसेच मॉन्सूनचा बदललेला पॅटर्न यांच्या एकत्रित परिणामामुळे संत्री-मोसंबीच्या आकारासारख्या अनेक गारांचा महाराष्ट्रावर मारा होत आहे. 

एच-10 वर महाराष्ट्र 
महाराष्ट्रावर होत असलेली गारपीट ही ब्रिटिशांनी बनविलेल्या "टोरो हेलस्टॉर्म इंटेन्सिटी स्केल'वर एच-10 पर्यंत (चढत्या क्रमाने एच-0 ते एच-10) पोचलेली म्हणजे सर्वाधिक भयानक अशी आहे. अर्ध्या तासाच्या कालावधीत नागपूर, भंडारा, गोंदिया, कळवण, साक्री, बागलान, लखमापूर आदी अनेक भागांत चार इंच व्यासापेक्षा मोठ्या आणि पाच ते पंधरा किलो वजनापर्यंतच्या गारा पडल्या. गारांचा हा आकार वाढत जाण्याची दाट शक्‍यता आहे. गारांच्या माऱ्यामुळे अनेक जण जागीच ठार झालेत. चेंडूच्या आकाराच्या गारांमुळे अनेक वाहनांच्या काचाही फुटल्या. 
छतावरील पाण्याच्या टाक्‍यांनाही मोठमोठी छिद्रे पडली. माणसांबरोबरच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, ससे आदी गुरेढोरेदेखील मृत्युमुखी पडली. चिमण्या, कावळे, पोपट, बगळे, कबूतरे, कोंबड्या, माकडे गतप्राण झाली. एवढेच नाही, तर काही ठिकाणी नदी, तलाव व विहिरींच्या काठावरचे मासेदेखील मृत झाले. 
गारपिटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यात झालेल्या गारपिटीने 20 हजार कोटींपेक्षा अधिक नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्रात गारांमुळे आंबा, गहू, ज्वारी, मका, तूर, हरभरा, कपाशी, तीळ, उन्हाळी व लाल कांदा, बटाटा, बाजरी, मिरची, टोमॅटो या पिकांचे, तसेच संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, केळी, बोर, आवळा, पपई, टरबूज आदी फळबागा, भाजीपाला व चाऱ्याचेही प्रचंड नुकसान झाले. खरिपाबरोबरच रब्बी हंगामातली लाखो हेक्‍टर शेतजमिनीवरील पिके जमीनदोस्त झाली. 

"पोलर व्हर्टेक्‍स'ची थंडी 
जानेवारी 2014 ची सुरवात झाली ती "पोलर व्हर्टेक्‍स'च्या थंडीने. थंड वाऱ्याच्या साधारणतः 1000 किलोमीटर व्यासाच्या पसरट "पोलर व्हर्टेक्‍स'चा उत्तर ध्रुवाकडचा फुगा फुटला. "पोलर व्हर्टेक्‍स'च्या कोशिकेने "जेट स्ट्रिम'च्या मदतीने अमेरिकेच्या डोक्‍यावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे आपला सारा थंडावा अक्षरशः ओतून दिला. परिणामी, अमेरिका आणि युरोप थिजून गेला. त्यानंतर ही थंडी आता जगभर पसरते आहे. जानेवारीत जम्मू-काश्‍मीरमध्ये बर्फवृष्टी झाली आणि 20 फेब्रुवारी ते 22 मार्च या एका महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र गारपिटीने झोडपून निघाला. हिमालयात नुकतीच भयानक बर्फवृष्टी झाल्याच्या बातम्या आल्या. त्याबरोबरच 5 एप्रिलपासून पुन्हा विजा, वादळांसह सुरू असलेल्या गारपिटीच्या फेऱ्यांना चालना मिळाली. 

"ग्लोबल कुलिंग'चा परिणाम 
चारशे वर्षांपूर्वी छोटे हिमयुग आले होते. "द डे आफ्टर टुमारो' या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आता छोटे हिमयुग येईल, असे काही संशोधकांचे मत आहे, तर आपण आताच हिमयुगाच्या सुरवातीच्या काळात वावरत असून, हिमयुगाला केव्हाच सुरवात झाली आहे, असेही काही संशोधकांना वाटते. 
सूर्य म्हणजे एक तप्त गोळा आहे. जेव्हा सूर्याच्या काही भागावरील तापमान कमी होते, तेव्हा त्यावर सौर डाग निर्माण होतात. ते डाग अधिक असले, तर सूर्याकडून येणारी उष्णता कमी होते. त्यामुळे पृथ्वीवर "ग्लोबल कुलिंग'ची प्रक्रिया सुरू होते, असे काही संशोधकांचे मत आहे. 
"ग्लोबल कुलिंग'चा सिद्धान्त हा "ग्रीन हाऊस इफेक्‍ट' म्हणजे पृथ्वीच्या वरच्या आवरणामुळे उष्णता आत अडकून पृथ्वी गरम होत आहे, ही गोष्ट नाकारत नाही; मात्र पृथ्वी गरम होण्याच्या वेगापेक्षा तिचा थंड होण्याचा दर वेगवान आहे, असे सांगतो. तापमानातील घसरणीमुळे जग थंड होत आहे, असे जागतिक तापमानाची नोंद ठेवणाऱ्या हॅडली, जीआयएसएस, यूएएच आणि आरएसएस या चारही यंत्रणांचे एकमत झाले आहे. गेल्या शंभर वर्षांत जग 0.65 ते 0.75 अंश सेल्सिअस इतके थंड झाले आहे, असे "ग्लोबल कुलिंग'चा सिद्धान्त सांगतो. 
सध्या जम्मू-काश्‍मीरच नव्हे, तर पुण्यासारख्या शहराची वाटचालही तापमानाचे नवे नीचांक नोंदविण्याकडे सुरू आहे, असे भासते आहे. 2013 मध्ये नायगरा धबधबा गोठलेला जगाने पाहिला. बगदादमध्ये प्रथमच झालेली हिमवृष्टी, शंभर वर्षांत कधीही पडली नाही अशी चीनमध्ये पडलेली थंडी, 116 वर्षांत उणे 16 अंश सेल्सिअस असा न्यूयॉर्कचा, तर उणे 52 अंश सेल्सिअस असा मॉंटाना येथील तापमान नीचांक, कधी नव्हता इतका अमेरिकेत भूभाग व्यापणारा बर्फ व हिमवृष्टी, जगभर वाढत असलेला पाऊस, ढगफुटीचे प्रकार (100 मिलिलिटर प्रति तास या दराने कमी वेळात अचानक पडणारा पाऊस) अशा अनेक घटना जागतिक थंडाव्यानेच घडत आहेत. 
या वर्षीदेखील जागतिक तापमानात घसरण होते आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा करणाऱ्यांना ही गोष्ट माहीत असल्याने ते दोन वर्षांपूर्वीच्या ग्लोबल वॉर्मिंगची आकडेवारी दाखवून चर्चा करतात; मात्र या वेळी उहाळा इतका आल्हाददायक व थंड का, एवढी प्रचंड गारपीट होण्यासाठी थंडावा आला कोठून, उत्तर ध्रुवावरचे बर्फ का विस्तारत जाड होते आहे, या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज त्यांना वाटत नाही. 

मॉन्सून पॅटर्न बदलला 
वातावरणात जे बदल होत आहेत, त्यांच्यापासून भारत अलिप्त राहू शकत नाही. मॉन्सून पॅटर्न बदलला आहे, हे ऋतुचक्राच्या सरमिसळीवरून आपण अनुभवतो आहोत. त्यासाठी शेतकऱ्याला वेगळे दाखले देण्याची गरज नाही. आगामी काळात मॉन्सून पॅटर्नमध्ये अधिक बदल होऊ शकतील. अवकाळी पाऊस वाढतो आहे आणि तो यापुढे अधिकच वाढू शकतो. जागतिक वातावरण बदलाची थेट प्रतिक्रिया देत मॉन्सून आपल्या खिशाला चाट लावतो आहे, हे महागाईवरूनदेखील स्पष्ट होत आहे. 

गारपीट आणि वादळी पावसाच्या फेऱ्या 

मॉन्सूनपूर्व काळात आणि मॉन्सून सक्रिय नसतानादेखील गारपिटीबरोबरच महाराष्ट्रात वादळी पावसासह विजा पडत आहेत. गारपीट आणि वादळी पावसाच्या फेऱ्यांबद्दल गेल्या बारा वर्षांच्या स्व-अनुभवातील निरीक्षणे पाहिली तर गारपिटीसह अवकाळी पाऊस पहिल्या फेरीमध्ये विदर्भाकडून कोकणाकडे झाला आहे, असा निष्कर्ष निघतो. सध्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा दुसरी फेरीचा प्रवास कोकणाकडून विदर्भाकडे सुरू आहे. कमी तीव्रतेच्या तिसऱ्या फेरीमध्ये उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्‍यता आहे. त्याचबरोबर पहिल्या फेरीप्रमाणे चौथी फेरी अधिक नुकसान करणारी ठरू शकते. ही फेरी विदर्भाकडून कोकणकडे जाईल. या काळात विजा आणि पावसापासून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

काय उपाय करता येतील? 
प्रामाणिकपणे आणि पद्धतशीरपणे केलेल्या प्रयत्नांना जोड देत शिल्लक काड्यांमधूनही कण-कण वाचवत मणभर साठविता येते, याची जाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आहे. गारपिटीचा मुकाबला कठीण असला तरी हे अशक्‍य नाही. त्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात. काही प्रतिबंधात्मक, तर काही गारपिटीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 
गारपिटीपासून किंवा अवकाळी पावसापासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलविणे शेतकऱ्यांसाठी नेहमी फायद्याचे ठरते. ऍसिटिलीन व ऑक्‍सिजन एकत्र जाळून "शॉक वेव्ह' आइस्क्रीमच्या कोनासारख्या कोनातून ढगांवर सोडणे आणि त्याद्वारे गारांचे रूपांतर स्नो व पावसामध्ये करणे, हे तंत्र फ्रान्स व अमेरिकेतले शेतकरी गेल्या शेकडो वर्षांपासून वापरत आहेत. जमिनीवरून अग्निबाणाच्या साह्याने ढगात रसायनांचा मारा करून ढगाला पळवून लावण्याचे अथवा पाऊस पाडण्याचे तंत्र चीन व रशियाने विकसित केले आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे आपल्या शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळेल. गारपीट होण्याची शक्‍यता वाटताच चर्चची मोठी घंटा वाजवत "अलर्ट' देण्याचे व ढगापर्यंत शॉक वेव्ह पोचविण्यासाठीचे तंत्रही परदेशांत वापरले जाते. विशिष्ट घंटानाद करत नारोशंकराच्या घंटेचा पुराची सूचना देण्यासाठी नाशिकमध्येही पूर्वापार उपयोग होत असे, हा महाराष्ट्राचाही इतिहास आहे. 
गारा घरंगळून खाली पडाव्यात यासाठी वर्तुळाकार छत्र्यांची निर्मिती करत फळबागा झाकणे, प्लॅस्टिकच्या पत्र्याचा वापर करीत उतरत्या छतांची घरे उभारणे हे गारपिटीचा मुकाबला करताना लाभदायी ठरू शकते. ओले धान्य कोरडे करण्यासाठी साध्या हेअर ड्रायरचा अभिनव प्रयोगही शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतो. गारपिटीनंतर कीटक, बुरशी यापासून बचावासाठी कुजणारी फळे, फुले, फांद्या पाला-पाचोळा शेतातून ताबडतोब दूर हटविणे, कोमेजलेल्या पिकाला बांबू किवा बांबूच्या काड्यांनी आधार देत पीक वाचविण्याची पद्धत ऑस्ट्रेलियामध्येही वापरली जाते. ती आपल्याकडे सहज वापरता येऊ शकते. पिकांसह फळबागा असलेल्या क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदणे शेतकऱ्यांना लाभदायी ठरते. 

धोरणात्मक निर्णयांची गरज 
हवामानासंदर्भात शिस्तबद्ध, अचूक, विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णयांची तातडीने आवश्‍यकता आहे. हवामान खात्याच्या परिसंवादात होणाऱ्या चर्चेत सर्वसामान्यांना प्रवेश मिळण्यासाठी शेतकरी आग्रह धरू शकतात. हवामानाबाबतच्या प्रत्येक कार्यक्रमात शास्त्रज्ञ, नोकरशाह यांनी शेतकऱ्यांनाही सामील करून घेणे हवामान खात्यावर बंधनकारक असायला हवे, यासाठी दबाव आणण्याचे काम शेतकरी करू शकतो. गारपिटीची "वॉर्निंग सिस्टीम', तसेच 24 × 7 हवामान-कृषी टीव्ही चॅनेल सुरू करण्यास पुणे हे अत्यंत योग्य ठिकाण ठरू शकेल. रिसर्च पेपरमध्ये हवेतले कोणते शोध लागले व हवामान खाते नेमके काय करते, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमे संशोधकांना बोलते करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 
व्हॉट्‌स ऍप आणि एसएमएसद्वारा प्रत्येक नागरिक व थेट शेतकऱ्यांना हवामान अलर्ट देता आले तर महाराष्ट्रात कितीतरी नुकसान टाळता येऊ शकते. त्याशिवाय गावातच किमान तीन आणि जास्तीत जास्त नऊ लोकांचा "समूह संपर्क गट' बनवता येऊ शकतो. याद्वारा एकमेकांना व एक-दुसऱ्या गटाला तातडीने माहितीचे आदान-प्रदान शक्‍य आहे. 

विजांपासून बचाव 
एका ढगाकडून दुसऱ्या ढगाकडे, हवेकडे अथवा जमिनीकडे विद्युतप्रवाह वेगाने प्रवाहित झाल्यास वीज कडाडते. दर वर्षी विजा पडण्यामुळे शेकडो नागरिकांना, तसेच गुरा-ढोरांना प्राण गमवावे लागतात, यात शेतकरी दगावण्याची संख्या सर्वांत जास्त आहे. झाडांना बांधून ठेवल्याने, उघड्यावर फिरत असल्याने अथवा धातूचे पत्रे असलेले गोठे वापरल्याकारणाने मोठ्या संख्येने जनावरे दगावतात. हे टाळण्यासाठी धातूच्या पत्र्याऐवजी प्लॅस्टिक अथवा ऍस्बेस्टॉसचे पत्रे वापरणे अधिक सुरक्षित ठरू शकते. विजा कोसळत असताना निघणाऱ्या शलाकांच्या संपर्कात आल्याने गंभीरपणे जखमा होतात. मालमत्तेचे नुकसान होते. पाऊस नसतानाही स्थानिक हवामानामुळे कडाडणाऱ्या विजा घातक ठरतात. याशिवाय आवाज न होता पडणाऱ्या विजा शक्तिशाली, विध्वंसक असतात. वास्तविक पाहता महाराष्ट्रात विजांची वादळे ही ईशान्य भारतापेक्षा तुलनेने कमी होतात; मात्र महाराष्ट्रात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कारण ईशान्य भारतात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंबाबत मोठी जनजागृती आहे. याउलट महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये विजा चमकत असताना घ्यायच्या काळजीसंदर्भात बेफिकीर वृत्ती दिसते. परिणामी, महाराष्ट्रामध्ये विजा पडून होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. उदा.- 2006 मध्ये प्रत्यक्ष विजा पडून अधिकृत नोंद झालेल्या मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात 665 होती. 

सुरक्षा महत्त्वाची! 
गारपीट, अवकाळी पावसात, विजा चमकत असताना तातडीने पक्‍क्‍या, कोरड्या, बंदिस्त जागेत आसरा घेऊन प्रत्येक व्यक्ती आपले प्राण वाचवू शकते. विजा चमकत असताना शेतात काम करणे, मैदानावर अथवा टेकडीवर फिरणे, झाडाखाली थांबणे, तारेवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी धाव घेणे, धातूचा पत्रा असलेल्या ठिकाणी व वाहत्या पाण्यात थांबणे, या गोष्टी टाळल्या तर आपली सुरक्षा सोपी होते. सुरक्षिततेसाठी लायटनिंग अरेस्टर अथवा कंडक्‍टर योग्य उंच ठिकाणी बसवूनदेखील हानी टाळता येईल. हे बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येऊ शकतो. गाव-वर्गणीतूनदेखील असे उपक्रम शेतकरी राबवू शकतात. 
अवकाळी गारपिटीचे चक्रव्यूह भेदताना, महागाईने "किचनला हार्ट ऍटॅक' येऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीदेखील काटकसर करणे आवश्‍यक आहे; तसेच अवकाळी पाऊस, विजा आणि गारपिटीचा मुकाबला करताना सकारात्मक "हवामान' बदलासाठी राजकीय दूरदृष्टीची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गरज आहे. 
_________________________________________________________________________________
Reference:http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20140426/4820827735497979184.htm

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण