... अन् भुर्र उडून जा!

आज मला विजय पाडळकर यांची एका पोक्त बापाची लघुकथा आठवते आहे. या बापाला एक दिवस, मुलगा सातव्या वर्गात असताना त्याच्यासाठी घेतलेली टेबल टेनिसची रॅकेट आणि चेंडू सापडतात. ते दिसल्यावर त्याला तो तेव्हा मुलाबरोबर खेळत असलेला, चेंडू खाली न पाडता त्याचे टप्पे बॅटवर मारत राहण्याचा खेळही आठवतो. (त्यावेळेस या खेळात तोच नेहमी जिंकत असे) आज हे आठवल्यावर तो बाप पुन्हा एकदा तसं खेळायचा प्रयत्न करतो. पण दहा-बारा टप्प्यांच्या वर त्याला ते जमत नाही.

कथेच्या शेवटी पाडळकर लिहितात, ''आजकाल तो रोज प्रॅक्टिस करतो आहे. एका महिन्यात चाळीस टप्प्यांपर्यंत मजल गेली आहे त्याची. त्याला खात्री आहे, अटलांटातला मुलगा जेव्हा पुढच्या दिवाळीला भेटायला येईल तेव्हा आपण नक्कीच त्याला हरवू शकू.''

परदेशात स्थायिक झालेल्या तरुण मुलांच्या आईबापांच्या आयुष्यातल्या पोकळीचं हृदय हेलावणारं दर्शन या छोट्याशा कथेमधून आपल्याला होतं आणि आपण चुकचुकतो. असे आयुष्य जगणारी अनेक वयस्कर जोडपी आज आपल्याला अवतीभवती दिसतात. आर्थिक समृद्धी आहे. पण मायेचं जवळ कुणीच नाही. त्यामुळे भयाण एकाकीपणा आहे, असहायता आहे आणि शिवाय मुलं, सुना, नातवंड यांचा कायमचा विरह आहेच.

याच विषयावरच्या 'संध्याछाया' या नाटकातल्या नानींच्या तोंडी असलेली काही वाक्य खूप बोलकी आहेत. नानी म्हणतात, ''पैसा हवाय कुणाला? करायचाय काय पैसा? म्हातारपणी आपल्या आसपास आपल्या मायेचं कुणी हवं असतं. कधी वाटतं-दुसऱ्याच्या हातचं जेवावं-आपणही मुलांसाठी, नातवंडासाठी काही करावं-गेली दोन वर्षे घरात गणपती आणलेला नाही. दिवाळी येते आणि जाते, कोण आहे घरात दिवाळी साजरी करणारं? एकाच घरात आजी-आजोबा, आई-बाबा आणि नातवंड राहताहेत. मुलं आजी-आजोबांच्या संस्कारात वाढत आहेत, मुलगा आणि सून घरातल्या मोठ्यांची काळजी घेताहेत, अडचणीच्या प्रसंगी आई-वडील आपल्या मुलाच्या पाठिशी उभे राहताहेत. दुःखाच्या प्रसंगात एकमेकांना आधार दिला जातो आहे. सगळे मिळून, सगळे सण आनंदानं साजरे करताहेत. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून घरात आनंदाचे-सुखाचे क्षण उधळले जात आहेत.

काही दशकांपूर्वी आपल्या समाजात-देशात जवळपास सगळीकडे दिसणारं हे दृश्य किती मनोहारी होतं? पण प्रगती, पैसा, ऐश्वर्य अशा शब्दांनी हे सुंदर चित्र विस्कटून टाकलं. प्रगती आली. पैसा आला. ऐश्वर्य, समृद्धी असं सगळं आलं पण ज्यांच्यासाठी हे सगळ आलं, ती रस्त्याची, मायेची माणसं मात्र हजारो मैल दूर फेकली गेली.

त्याला घास भरवताना

त्याची आई

नेहमी तालासुरात म्हणायची

''इथे इथे बस रे मोरा,

दाणा खा, पाणी पी

अन् भुर्र उडून जा.''

आणि बघता बघता एक दिवस

तो खरंच मोर झाला !

त्यानं दाणा खाल्ला,

पाणी प्यालं

आणि उडून गेला

भुर्र...

भरलेलं ताट घेऊन

दारात त्याची उपाशी आई

त्याची वाट पहात बसली

पण मोर झालेला तो मात्र

पुन्हा घरी परतलाच नाही!

नुसते आईवडीलच नाही तर हा देश, या देशाची माती, लांब गेलेल्या या मुलांची वाट पाहात आहेत, हे त्या बुद्धिमान मोरांना कळणार तरी केव्हा? 
 _________________________________________________________________________
संदर्भ : प्रशांत असनारे-http://maharashtratimes.indiatimes.com/edit/maza-adhyatma/prashant-asnare/parents-soreness/articleshow/47020174.cms

Comments

Popular posts from this blog

आई -तृतीय पुण्यस्मरण

आठवण आईची-पाचवे पुण्यस्मरण

आई-चतुर्थ पुण्यस्मरण